सोलापूर : ‘राष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी आजच्या तरुण पिढीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे,’ असे प्रतिपादन सुप्रभात ग्रुपचे सदस्य सूर्यभान चव्हाण यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महादेवी लंकेश्वर यांनी भूषविले.
या वेळी व्यासपीठावर सरपंच दिनकर कदम, ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील, स्थानिक शाळा समितीचे सदस्य नागनाथ माळी, नारायण गायकवाड, मुख्याध्यापक एस. एम. बागल, माजी मुख्याध्यापक एम. जे. चौधरी, पर्यवेक्षक डी. एम. गणपाटील, पोपट भोसले, बाळासाहेब भोसले, दत्तात्रय भोसले, नवनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी श्री. चव्हाण यांनी मनोगतात कोणत्याही समाजातील मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी ग्रामस्थांनी घेण्याची गरज असून, गरिबांच्या मुलींना उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे नमूद केले. या प्रसंगी रयत सेवक चंद्रकांत मलपे यांच्या शोधनिबंधास राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रामस्थ व सुप्रभात ग्रुपतर्फे सरपंच दिनकर कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी वक्त्या दीपाली फटे, बाळासाहेब पाटील व नारायण गायकवाड, चंद्रकांत मलपे आदींनी मार्गदर्शन केले.
या वेळी पालक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. ए. एस. कंदले यांनी आभार मानले.